कोल्हापूर न्यूज नेटवर्क
बिद्री साखर कारखान्याचा इथेनॉल प्रकल्प ऊस प्रक्रिया क्षेत्रात विविधता निर्माण करून शेतकऱ्यांसाठी नव्या आर्थिक संधी उपलब्ध करून देणारा आहे. इथेनॉल उत्पादनामुळे ऊसाचे अधिक मूल्य मिळते, त्याचबरोबर पर्यायी इंधनाच्या निर्मितीसाठीही तो एक महत्त्वाचा टप्पा आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले .
श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड, मौनीनगर-बिद्री येथील इथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटनअत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. या उद्घाटन समारंभाचे मुख्य अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार बोलत होते . प्रमुख उपस्थिती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची होती.
अजितदादा पवार यांनी प्रकल्पाचे कौतुक करत सहकारी क्षेत्राच्या आधुनिक वाटचालीचे समर्थन केले आणि अशा प्रकल्पांमुळे ग्रामीण भागाचा आर्थिक विकास साधला जातो, असे नमूद केले. हसनसाहेब मुश्रीफ यांनीही या प्रकल्पाच्या यशस्वीतेबद्दल शुभेच्छा देत, कारखान्याचा कारभार पारदर्शक आणि शेतकरीहितार्थ राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
या समारंभास कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, माजी आमदार बजरंगआण्णा देसाई, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील - आसुर्लेकर, गोकुळचे संचालक युवराज पाटील (बापू), केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्यासाहेब माने, गोकुळचे संचालक किसनराव चौगुले, यांच्यासह कारखान्याचे संचालक मंडळ, स्थानिक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------------