आरक्षण दिल्यास राजकारणात येणार नाही - मनोज जरांगे पाटील

Kolhapur news
By -

 


                   


                    कोल्हापूर न्यूज नेटवर्क


            मनोज जरांगे यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा महायुती सरकारला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. आमची राजकारणात येण्याची इच्छा नाही. पण सरकारने आरक्षण दिले नाही तर आमच्यापुढे राजकारणात येण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही. त्यामुळे सरकारने कोणतेही आढेवेढे न घेता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. आम्ही राजश्री शाहू महाराजांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा पुनरुच्चार मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापूर येथील आपल्या रॅलीत बोलताना केला. येथील केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली की लावली गेली? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.


मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली शुक्रवारी सांगलीहून कोल्हापूरला पोहोचली. तिथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यांनी सर्वप्रथम शहरातील दसरा चौकात जावून शाहू महाराजांना अभिवादन केले. भस्मसात झालेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाची ही त्यांनी पाहणी केली .