आयएएस तुकाराम मुंढेंनी जपला पुरोगामी वारसाः आईच्या अस्थींवर लावले वडाचे रोप; कर्मकांडांना फाटा देत दिला नवा संदेश

Kolhapur news
By -

 

       



 पुणे : सेवेतील शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयएएस तुकाराम मुंढे यांच्या मातोश्री आसराबाई यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. आईच्या निधनाची वार्ता समजताच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक कर्तव्यावर असलेले मुंढे तातडीने पुण्यामार्गे आपल्या बीड जिल्ह्यातील ताडसोना या मूळगावी पोहोचले. संपूर्ण कुटुंबाच्या आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्या मातोश्रींवर अंत्यसंस्कार पार पडले.


एरवी कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून परिचित असलेल्या तुकाराम मुंढे यांच्यातील संवेदनशील आणि हळवा माणूस या निमित्ताने सर्वांनी पाहिला. आईच्या पार्थिवाकडे पाहून आणि आपल्या भावाच्या गळ्यात पडून अश्रृंना वाट करून देणाऱ्या मुंढेंना पाहून उपस्थित सर्वच जण भावूक झाले होते. आईच्या निधनाने त्यांच्या व्यक्तिगत जीवनात निर्माण झालेली पोकळी आणि त्यांचे मातृप्रेम त्यांच्या या आवेगातून स्पष्टपणे जाणवत होते.


    मातोश्रींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी सामाजिक जाणीव जपतानाच पारंपरिक कर्मकांडांना फाटा देऊन एक नवा आदर्श समाजासमोर ठेवला. अस्थिविसर्जनासाठी दहा दिवसांची वाट न पाहता किंवा कोणत्याही नदीपात्रात न जाता, त्यांनी दुसऱ्याच दिवशी आपल्या शेतातील घरासमोर एक खड्डा खणला. त्यात मातोश्रींच्या अस्थींचे विसर्जन करून त्यावर वडाचे एक रोपटे लावले. विशेष म्हणजे, त्यांनी स्वतः राबून हा खड्डा खणला, माती ओतली आणि हे वृक्षारोपण केले.


अनावश्यक रूढी-परंपरांना छेद देत निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची ही कृती सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. वृक्षारोपणाच्या माध्यमातून आपल्या आईच्या आठवणींना चिरंतन जपण्याचा हा स्तुत्य उपक्रम सर्वत्र वाखाणला जात आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि शिस्त जपणाऱ्या मुंढेंनी आपल्या खासगी आयुष्यातही अशा प्रकारे पुरोगामी विचार कृतीत आणल्याने त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. 


                 --------------------