रायगड : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी युगपुरुषांचा वारंवार होणारा अवमान थांबवण्यासाठी अजामीनपात्र कायदा तयार करण्याची मागणी केली. त्यांनी यासंबंधी सरकारकडे शिवरायांचा इतिहास प्रकाशित करण्याचाही आग्रह धरला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले उभे आयुष्य लोकांसाठी वेचले. स्वराज्याची स्थापना केली. लोकशाहीचा विचार दिला. पण आता त्यांचा वारंवार अवमान केला जात आहे. त्यामुळे त्यांच्यासारख्या युगपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना शासन करण्यासाठी एक अजामीनपात्र कायदा करण्याची गरज आहे, असे ते म्हणालेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 345 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना किल्ले रायगडावर जाऊन अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी उपरोक्त मागणी केली. ते म्हणाले, मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 4-5 मागण्या करणार आहे. आज आपण एका थोर व्यक्तीपुढे नतमस्तक होण्यासाठी येथे आलो आहोत. शिवाजी महाराजांनी समतेचा विचार दिला. त्यांनी लोकांसाठी आपले उभे आयुष्य वेचले. स्वराज्याची स्थापना केली. त्यांनीच लोकशाहीचा विचार दिला. राज्य कारभारात लोकसहभाग असावा ही त्यांचीच संकल्पना होती. त्यांनी त्याचा मूळ पाया रचला. पण अलीकडच्या काळात त्यांचा वारंवार अवमान केला जात आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी एक कायदा तयार करण्यात यावा. हा कायदा नॉन बेलेबल असावा. युगपुरुषांचा अवमान करणाऱ्यांना 10 वर्षे जामीन मिळता कामा नये.
-------------------------------