मुंबई : शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची मागणी करणाऱ्या बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच खडसावले आहे. शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करताना त्यांच्याकडे सिबिलची विचारणा करू नका. राज्य व शेतकऱ्यांच्या सर्वसमावेशक विकासासाठी बँकांनी राज्य सरकारशी समन्वय साधून काम केले पाहिजे, असे ते या प्रकरणी बँकांना खडसावत म्हणाले.
मुंबईत सोमवारी राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयसीआयसीआय, एचडीएफसी व अॅक्सिस या खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकांना चांगलेच खडेबोल सुनावले. ते म्हणाले, बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज देताना त्यांच्याकडे सिबिलची मागणी करू नये. रिझर्व्ह बँकेचे तसे आदेश आहेत. पण त्यानंतरही शेतकऱ्यांना सिबिल मागितले जाते. त्यामुळे आम्ही अशा बँकांवर एफआयआर दाखल केला आहे. तुम्हाला हे गांभिर्याने घ्यावेच लागेल. पर्यायी तोडगा काढावाच लागेल.
------------------------