कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
कवी केशवसुतांनी लिहीलेली तुतारी ही क्रांतिकारक कविता म्हणजे मराठी साहित्यातील मैलाचा दगड म्हणावी लागेल.
या कवितेत चैतन्यदायी विचार मांडले आहेत .सद्या मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकारण बरेच तापले आहे.
या तापल्या तव्यावर काका आपली पोळी कशी भाजून घेणार आहेत ते पाहूया.
कवितेच्या पहिल्या चार ओळी ऐकुया.
" एक तुतारी द्या मज आणुनी,
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनी टाकीन सगळी गगने
दीर्घ तिच्या त्या किंकाळी ने."
मराठा आरक्षणावर काकांचे जे राजकारण सुरू आहे त्याचा या कवितेशी काय संबंध ?
ते ही पाहूया .
मराठा आरक्षणाचा योद्धा म्हणून मनोज जरांगे यांच्या कडे पाहिले जाते.
योद्धा म्हंटले की युद्ध आले. युद्ध म्हंटले की रणशिंग आले.तुतारी हे रणशिंग आहे.
हे रणशिंग काकांच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे.
थोडे मागे जाऊ.
काकांनी संविधान नावाचा फासा टाकून लोकसभा निवडणुकीत भाजपाला दे माय धरणी ठाय करून टाकले आहे.
या एका हत्याराने मुस्लिम व आंबेडकरी समुदाय बिथरून गेले होते.
मुस्लिमांना वाटले की शरीयत गायब होईल व आंबेडकरांच्या कोट्यवधी अनुयायांना वाटले की बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागेल.
भाजपची चारशे पार घोषणा दगा देऊन गेली आणि महाराष्ट्रात भाजपाला दोन अंकी आकडा सुध्दा गाठता आला नाही.
व्वा रे व्वा! राजकारण !
काकांनी पुतण्याला पण धोबी पछाड केले.
आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीवर काकांचा डोळा आहे.
तेथे संविधान हे हत्यार चालणार नाही.
त्यासाठी मराठा आरक्षण युद्ध उपयोगी पडणार आहे.
जरांगे यांचे हाती त्यांनी हळूच तुतारी सरकवली आहे.
नाहीतर जरांगे म्हणालेतच,
जे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत त्यांना निवडणुकीत पडणार.२८८ जागा लढवाव्या लागल्या तरी चालेल.
नेमक्या याच दुखऱ्या नसेवर काकांनी बोट ठेवले आहे.
जरांगे यांचा राजकीय पक्ष नाही.निवडणुकीसाठी ताकदीचे उमेदवार नाहीत.आणि निवडणूक लढवण्याइतकी पैशाची ताकदही नाही.
त्यांनी आशेने काकांच्या कडे पाहिलेले असावे.
काका हुशार. आंतरवली सराटी येथे जरांगेचे पहिले उपोषण झाले होते तेंव्हा काका धावत तेथे गेले होते.तेथे त्यांची किती छी थू झाली होती हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिले होते.
काका हरले नाहीत.संविधान चा फासा लागू पडत नाही म्हणून त्यांनी दुसरा एक फासा टाकलाय.
' फडणवीस '
जरांगे नी लगेच म्हंटले .फडणवीस यांच्या मुळेच मराठा आरक्षण मिळाले नाही.
व्वा रे व्वा !
फासा बरोबर बसला.
चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलेले काका गालात हसले असतील.
याला म्हणतात राजकारण.
महाराष्ट्राचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे फडणवीस सुध्दा डोके खाजवत बसले आहेत.
खरं तर त्यांच्या मुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले होते .ते नंतर आलेल्या सरकारच्या 'उध्दट' पणा मुळे कोर्टात टिकले नाही.
तुतारीची गगन भेदी किंकाळी सगळ्यांची झोप उडवणार असे दिसते.
तुतारी कवितेतील आणखी कांहीं ओळी ऐकुया.
" जुने जाऊद्या मरणालागुनी .
जाळूनी किंवा पुरूनी टाका.
सावध ऐका पुढल्या हाका."
म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं.आता पुढचा वेध घेऊ.
विधानसभेचा वेध.
काकांना व मनोज जरांगे यांना पण माहिती आहे की कोणतेही सरकार आले तरी घटनेत बसेल असे व कोर्टात टिकेल असे आरक्षण मिळू शकत नाही.
जरांगे भाई बोलून गेले.
मुस्लिमभाईना पण आरक्षण मिळालं पाहिजे.
काकांची चतुराई कामी आली.
प्रश्न लोंबकळत ठेवायचा .साप सुध्दा दुसऱ्याच्या काठीने मारायचा.
काकांची तुतारी आता कागलच्या सीमेवर येऊन थडकली आहे.तिची किंकाळी उत्तुर गडहिंग्लज पर्यंत ऐकू गेली असेल.
पांडव द्युतात हरले होते कारण शकुनी मामांचे सगळे फासे मंतरलेले होते.
काकांचे फासे तसेच आहेत.
कवी केशव सूत सुध्दा म्हणाले असते
माझी तुतारी खरंच इतकी 'पॉवर फुल्ल 'आहे
.

