कोल्हापूर न्यूज / वि.रा.भोसले
लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे निधन झाले.मुरगूड मधील शिवराज हायस्कूल च्या प्रांगणात अंतिम संस्कार व शोक सभा झाली.अनेक वक्त्यांनी शब्द श्रद्धांजली वाहिली.राधानगरी मतदार संघाचे आमदार प्रकाशराव आबिटकर यांनीही आपल्या ओजस्वी वाणीने वाहिलेल्या श्रद्धांजली मुळे कित्येकजण मनोमन भारावून गेले.डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत कांहींजण पुटपुटले
"आमचा साहेब लै भारी माणूस होता . दुसऱ्या तालुक्यातील माणूस सुध्दा त्यांचं एवढं कौतुक करतोय हेच्यातच सगळं आलं."
प्रकाशराव आबिटकर यांच्या वक्तृत्वाची ही केवळ तारीफ नव्हती .थंडीत कुडकुडणाऱ्याच्या अंगावर एखाद्याने आपुलकीने रजई पांघरावी तसे त्यांचे भाषण होते."स्व.मंडलिक साहेब माझे आदर्श आहेत.त्यांच्या नेतृत्वातून मी खुप कांहीं शिकलो. त्यांचा वसा पुढे चालवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होय."त्यावेळचे त्यांचे शब्द पुढे अनेक दिवस श्रोत्यांच्या ह्र्दयाच्या देव्हाऱ्यात स्निग्ध ज्योती प्रमाणे तेवत राहिले होते.माजी खासदार संजयदादा मंडलिक यांनासुध्दा एक खंदा मित्र मिळाल्याचे समाधान वाटले होते. ती साथ त्यांनी तशीच निभावली सुध्दा.प्रकाशरावांच्या शब्दात अशी स्निग्धता आणि आपुलकी आजही पहायला मिळते.जोडीला हसतमुख प्रसन्न चेहरा .
त्यामुळेच ते आजरा ते राधानगरी येवढ्या विस्तृत मतदार संघावर आपली छाप उठवू शकले.त्यांच्या बद्धल कोणीही कधीही निराशेचे शब्द काढले नाहीत.त्यांच्या कर्तृत्वाबद्धल प्रत्येकाच्या मनात विश्वास असायचा आणि नेतृत्वाबध्दल कमालीचा आदर असायचा. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे .नेता हा झाडावर पिकलेल्या आंब्यासारखा असावा , आडीत घालून पिकवलेला नसावा.
प्रकाशराव आबिटकर यांनी साहेबांचे नेमके हेच वाक्य उचलले असावे.त्यामुळे राधानगरी मतदारसंघातील बहुपंथीय समाजाच्या कसोटीला उतरलेले नेतृत्व आज कॅबिनेट मंत्री पदापर्यंत पोचू शकले आहेत.आमदार बघता बघता नामदार झाले .
युवक मंडळाचा अध्यक्ष,ग्राम पंचायत,तालुका पंचायत ,जिल्हा परिषद ,विधानसभा अशा सर्व स्वराज्य संस्था मध्ये त्यांनी स्वतःच्या विनयशील नेतृत्वाची,प्रभावी वक्तृत्वाची आणि प्रामाणिक कर्तृत्वाची छाप पाडली .झाडावर पिकलेला हापूस महाराष्ट्राला मिळाला आहे.माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रचारसभेत लोकांना सांगितले होते प्रकाशरावांना तुम्हीं निवडून द्यायचे आणि मी त्यांना मंत्री करायचे.
त्यांनी आपले शब्द खरे केले.एखादे राज्यमंत्रीपद त्यांना दिले जाईल असे आधी अनेकांना वाटले होते. टीव्हीवर ३३ कॅबिनेट मत्र्यांची नावे झळकत होती. त्यात प्रकाश सुशिलाताई आनंदराव आबिटकर हे नाव झळकले आणि मतदार संघात आकाशव्यापी आतषबजी सुरू झाली.मतदारसंघात भिरभिरणाऱ्या मनमोकळ्या हसऱ्या चेहेऱ्यावर राज्याच्या जबाबदारीचे गांभीर्यही लगोलग पसरत गेल्याचे महाराष्ट्राने टीव्ही वर पाहिले. आजरा ते राधानगरी व्हाया गारगोटी असा विकासाचा प्रकाशच प्रकाश पहायला मिळाला होता.
आता सारा महाराष्ट्र या सूर्याला पहायला उत्सुक झाला आहे.एकनाथजी आपण खरोखर उत्तम रत्नपारखी आहात.उत्कृष्ट शेतकरी आहात . पाडाला आलेला झाडावरचा आंबा अलगद उचलला आहात. आपल्या आक्रमक नेतृत्वाची झलक यापूर्वी पहायला मिळाली आहे.आता कल्पक मुत्सद्दी नेतृत्व सुध्दा पहायला मिळाले . एका अत्यंत प्रगत , सुशिक्षित , पुरोगामी तरीही स्वाभिमानी अशा राज्याची जबाबदारी आपल्यावर पडली आहे.
देवेंद्रजी अजीतजी यांना साथ देत हा गाडा चालवायचा असेल तर ना.प्रकाशरावांच्या सारखे विनयी आणि संयमी शिलेदार सोबत असायलाच हवेत.
जय महाराष्ट्र.
----------------------------------------------


