कोल्हापूर न्यूज नेटवर्क
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी भगवा पोशाख धारण करून कावड फेरी केल्याचे कधी पाहिले आहे ?पंतप्रधानांना धोती मध्ये नृत्य करतांना पाहिले आहे ?सलमाला उघड्यावर अभिनेत्रींशी रोमान्स करतांना पाहिलंय ?श्री रामांचे अवाढव्य धनुष समुद्रातून वर काढलेले व त्या भोवती नेव्हीचे जवान फेरी मारताना पाहिले आहे.? हे सगळं ए आय ने सोशल मीडियावर दाखवायला सुरुवात केली आहे.रील्स च्या नावावर तद्दन खोटी आणि फसवी दृश्ये दाखवून युवा पिढीची अक्षरश: फसवणूक चालली आहे.
वर दिलेली कांहीं ठळक उदाहरणे आहेत.असे शेकडो रील्स सोशल मीडियावर रोज दाखवले जातात. नवख्या पोरांना ते खरे वाटतात.या रील्स वर कसलेही बंधन नाही.सोशल मीडियावर ए आय चा असा हा धुमाकूळ सुरू आहे. यू ट्यूब,फेस बुक, इंस्टाग्राम,इत्यादी वर ए आय (कृत्रिम बुद्धिमत्ता) ने नको असलेला जो नंगानाच चालवला आहे तो थांबवण्यासाठी एखादा कडक कायदाच होणे गरजेचे आहे.
वास्तविक हे नवीन तंत्रज्ञान उद्योगधंदे,शेती व्यवसाय,युद्ध साहित्य,अंतराळ संशोधन इत्यादी मध्ये वापरले जावे अशी अपेक्षा असते. या रील्सनी मृत व्यक्तींना सुद्धा जिवंत दाखवून कुटुंबाच्या भावनांशी खेळ केला आहे. उमलत्या युवा पिढीची भावनिक कुतरओढ करून त्यांच्या नैसर्गिक बुद्धिचे लक्तरात रूपांतर करण्याचे काम सुरू आहे . पोरांची वैचारिक बैठकच उध्वस्त होईल अशी मायावी दृश्ये दाखवून रील्स वाल्यांना काय साधायचे आहे ?
आज प्रत्येक हातात मोबाईल आहे. दळणवळणात आणि नित्य व्यवहारात वापरले जाणारे अत्यंत सोयीचे साधन म्हणून ते वापरले जाते.कॅशलेस व्यवहार, बस रेल्वे,विमान प्रवासाच्या तिकिटांचे बुकिंग,प्रवासात गुगल नकाशे इत्यादी साठी किंवा संगीत ऐकण्यासाठी या साधनाचा वापर सर्रास होत असतो.ए आय ने मात्र एक नवीन फॅड मोबाईलवर आणले आहे. युवकांच्या अनमोल आयुष्याची धूळधाण करणारा व नैसर्गिक बुद्धिमत्तेचा संहार करणारा ए आय चा धुमाकूळ कायद्यानेच थांबवला पाहिजे.
धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश कायद्याने रोखले आहेत तसे ए आय चे विकृत संदेश रोखले पाहिजेत.
--------------------------