कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी कर्ज फेडत नाहीत - नामदार हसन मुश्रीफ

Kolhapur news
By -

 

      

             


           कोल्हापूर न्यूज नेटवर्क

 

  मी पुढेमागे कधी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना दुप्पट अनुदान देईन. शेतकऱ्यांना आता 50 हजार मिळत असतील तर मी ती रक्कम 1 लाख रुपये करेन, असे वक्तव्य राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ  यांनी केले. लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी  करण्यात अडथळे येत असल्याचे त्यांनी म्हटले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं कागल तालुक्यातील वंदूर येथील कार्यक्रमात बोलताना हे  वक्तव्य केले. सोबतच शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर ते कर्ज फेडत नाहीत. त्यामुळे बँका बुडतात, असेही  मंत्री मुश्रीफ म्हणाले. 


कागल तालुक्यातील वंदूर येथे कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात बोलताना हसन मुश्रीफ यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात भाष्य केले. लाडकी बहीण योजनेमुळे सध्या राज्य सरकारसमोर आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी सुमारे 46 हजार कोटींचा खर्च करावा लागत आहे. काही पुरुषांनीही या योजनेचा गैरफायदा घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी लांबणीवर जात आहे


आमच्या सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे वचन दिले आहे. पण सध्याची परिस्थिती थोडी अवघड आहे. लाडक्या बहि‍णींना 46 हजार कोटी रुपये द्यावे लागत आहेत. काही पुरुषांनीही लाडक्या बहीण योजनेचे  पैसे घेतले. आमची अडचण असली तरी आम्ही कर्जमाफी अनेकदा केली आहे. पण कर्जमाफीबाबत माझं मत वेगळं आहे. कर्जमाफी करणार म्हटलं की,  शेतकरी कर्ज भरत नाहीत. त्यामुळे बँका अडचणीत येतात. बच्चू कडू यांच्या आंदोलनामुळे पतसंस्थांचे 38 हजार कोटी रुपये थकल्याचे मी ऐकले. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना आपण दुप्पट पैसे दिले पाहिजेत. म्हणजे शेतकऱ्यांना पैसे भरायची सवय लागेल. नाहीतर नुसती कर्जमाफी करत राहिले तर थकबाकीमुळे बँका बुडून जातील, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.


यावेळी हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमधील  कर्जाची वसुली चांगल्याप्रकारे झाल्याबद्दल कोल्हापूरमधील शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. मी कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. गेल्यावर्षी कोल्हापूरमध्ये कृषी कर्जाची वसुली 90 टक्के झाली होती, ती यंदा 91 टक्के झाली आहे. कोल्हापूरातील शेतकरी हिंमतवाला आहे, त्याला फुकटंच काही नको, त्याचा ऊस कारखान्यात जातो, तिथून पैसे सोसायटीत येतात, या लिकिंगच्या वसुलीमुळे कर्ज परतफेड होते. आम्हाला भीक नको, आम्हाला हक्काचं द्या, असं  कोल्हापूरकर शेतकरी म्हणतो, म्हणून कर्जाची इतकी परतफेड झाली. 

               -------------------------