एआयद्वारे ऊस उत्पादन वाढीसाठी शाहू कारखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार- राजे समरजितसिंह घाटगे :नानीबाई चिखली येथे कारखाना पुढाकाराने शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर उभारलेल्या एआय संचचे उद्घाटन

Kolhapur news
By -

 

      


          कोल्हापूर न्यूज नेटवर्क  


         ऊसाचे दिवसेंदिवस घटत चाललेले उत्पादन ही साखर उद्योगासाठी चिंतेची बाब असून उत्पादनवाढ हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे.कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे यांनी शाहू कारखान्यात ऊस उत्पादन वाढीसाठी स्वतंत्र ऊस विकास कार्यक्रम सुरू करून कमी उत्पादन असणाऱ्या  शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.त्याच विचारांची परंपरा पुढे नेत आता प्रयोगातून उपयुक्त ठरलेल्या एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यास कारखाना प्रोत्साहन देत आहे.यामध्ये  शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले


नानीबाई चिखली ता कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकाराने राजेंद्र नुल्ले यांच्या प्रक्षेत्रावर कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान संच उभारण्यात आला.या संचचे उद्घाटन समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते

   

ते पुढे म्हणाले, उसाच्या कमी उपलब्धतेमुळे कारखान्यांच्या गाळप क्षमतेवर थेट परिणाम होत असून साखर कारखानदारी अडचणीत सापडत आहे. उत्पादन वाढल्यास गाळपाचे दिवस वाढतील व कारखाने अधिक सक्षम होतील.संशोधन केंद्रातील अद्ययावत तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविण्यात शाहू साखर कारखाना नेहमीच आघाडीवर राहिला आहे. एआय तंत्रज्ञानाचा वापर हे त्याचे पुढचे पाऊल आहे. स्वर्गीय राजेसाहेब नेहमी सांगत असत की, कारखान्याने कितीही चांगला दर दिला तरी उसाचे उत्पादन वाढल्याशिवाय शेती परवडणार नाही. त्यामुळे ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.एआय तंत्रज्ञान वापरणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शाहू साखर कारखाना ठामपणे उभा राहील.अशी ग्वाहीही त्यांनी दिली.यावेळी शाहू कृषीचे संचालक राजेंद्र नुल्ले यांनीही मनोगत व्यक्त केले.


     यावेळी व्हा. चेअरमन अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण,राजे बँकेचे व्हा.चेअरमन रवींद्र घोरपडे,संचालक संजय चौगुले ,प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक अरुण पाटील, शाहू कृषीचे संचालक जगदीश मोरे, कार्यकारी संचालक सदानंद घोरपडे,पंचायत समिती सदस्या सुवर्णा जाधव,सर्जेराव तुकान,तुकाराम संकपाळ,आण्णासाहेब गळतगे आदी उपस्थित होते.शेती अधिकारी दिलीप जाधव यांनी स्वागत केले.ऊस विकास अधिकारी सुजयकुमार पाटील यांनी प्रास्ताविक केले.बाळकृष्ण काईंगडे यांनी आभार मानले.


      ------------------------------


शाहू साखर कारखान्यामार्फत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन बसवण्यासाठी प्रोत्साहनपर महत्वकांक्षी योजना राजे समरजितसिंह घाटगे  यांनी जाहीर केली. या योजनेनुसार ठिबक सिंचनसाठी एकरी अंदाजे येणाऱ्या साठ हजार रुपये रकमेपैकी दहा हजार रक्कम शेतकऱ्याने भरायची आहे,तर उर्वरित रक्कम राजे बँकेमार्फत सवलतीच्या व्याजदरात शेतकऱ्यांना विना जामीनदार देण्यात येणार आहे.तसेच कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांप्रमाणे कार्यक्षेत्राबाहेरील सातत्याने ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांनाही खते बियाणे औषधे व इतर अनुषंगिक निविष्ठा उधारीवर उपलब्ध करून दिल्या जातील, अशीही घोषणा राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.

----------------------------------------

                   

  नानीबाई चिखली ता कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखानाच्या पुढाकाराने राजेंद्र नुल्ले या शेतकऱ्याच्या प्रक्षेत्रावर उभारलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान संचच्या उद्घाटनवेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह  घाटगे,शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण व इतर मान्यवर.


         ---------------------------