स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वंकष लढ्याची घोषणा

Kolhapur news
By -

      


निपाणी : स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम यांच्या कुटुंबीयांवर दहा वर्षांपूर्वी झालेल्या अन्याय व हल्ल्याच्या घटनेची आठवण ठेवत, या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी पुढील कार्यवाही ठरविण्यासाठी आज चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


बैठकीच्या प्रारंभी स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर बाबासाहेब मगदूम यांनी गेल्या दहा वर्षांच्या संघर्षाचा आढावा घेत, या काळात सहकार्य करणाऱ्या सर्व व्यक्ती व संघटनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सातत्याने प्रयत्न करूनही अद्याप न्याय मिळालेला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.


यावेळी प्राचार्य डॉ. अच्युत माने यांनी सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून विविध स्तरांवर पाठपुरावा करूनही न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आता बेळगाव येथे पत्रकार परिषद घेऊन पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्यात येणार आहे.”


बैठकीत संमत करण्यात आलेल्या ठरावात म्हटले आहे की, “अन्यायग्रस्त स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती मगदूम कुटुंबाला दहा वर्षे उलटूनही न्याय मिळालेला नाही. यासाठी शासन आणि न्यायव्यवस्था हे दोन्ही घटक जबाबदार आहेत. या अन्यायकारक व्यवस्थेविरुद्ध सर्वंकष लढा उभारण्याची घोषणा आम्ही करत असून, याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करण्यात येणार आहे.”


या ठरावाचे सूचक प्रा. एन. आय. खोत तर अनुमोदक जयराम मिरजकर होते.


चिंतन बैठकीस जयराम मिरजकर, प्रा. एन. आय. खोत, विठ्ठल वाघमोडे, सुधाकर माने, संजीवकुमार शितोळे, अशोक खांडेकर, आनंद संकपाळ, विश्वनाथ किल्लेदार, सुनील माने  आणि सर्व मगदूम कुटंबिय आदी उपस्थित होते.



          ---------------------------