कोल्हापूर न्यूज नेटवर्क
गगनबावडा तालुक्यातील खेरीवडे ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच सौ. शारदा पाटील यांनी वटपौर्णिमेनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अभिनव उपक्रम राबविला. पारंपरिक पद्धतीने महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून फेऱ्या मारण्याबरोबरच प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावण्याचा संकल्प केला आणि प्रत्यक्ष वृक्षारोपण करून पर्यावरण वाचवा संदेश दिला . या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, महिला बचतगट, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण न राहता पर्यावरण रक्षणाची सामूहिक चळवळ बनावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सरपंच सौ. शारदा पाटील यांनी सांगितले. "वडाच्या झाडाची पूजा करून दीर्घायुष्याची प्रार्थना करतो, त्याचबरोबर भविष्यातील पिढ्यांसाठी नवीन झाडे लावणे हे देखील आपली जबाबदारी आहे," असा संदेश त्यांनी यावेळी दिला. लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारीही सहभागी महिलांनी स्वीकारली. धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संवर्धन यांची सुंदर सांगड घालणारा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला असून, इतर गावांनीही अशा उपक्रमांचे अनुकरण करावे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
यावेळी ग्रामसेवक ,महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
----------------------


