कोल्हापूर न्यूज नेटवर्क
वेदगंगा नदीला महापूर आल्यामुळे नानीबाई चिखली येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी गावाला भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली. गावाच्या पश्चिमेकडील बायपास रस्त्याकडून पाणी शिरलेल्या भागासह चावडी गल्ली ,शेजारच्या कौलगे रस्त्यावरील नानीबाई चिखली वेस परिसराची पाहणी केली. त्यांनी येथील कुमार विद्यामंदिर शाळेत असलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन महापूरग्रस्तांच्या अडीअडचणीही जाणून घेतल्या.
मंत्री श्री. मुश्रीफ यांनी महापुरामुळे पाणी शिरलेल्या घरांचे आणि पडझड झालेल्या घरांचे नुकसान झालेल्या शेतीचेही पंचनामे करून नुकसान भरपाई तातडीने देण्याचे आदेश प्रशासनास दिले.
यावेळी बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीणसिंह भोसले, कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य सदाशिव तुकान, प्रांताधिकारी सुशांत बनसोडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे,सरपंच अल्लाबक्ष सय्यद, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल नुल्ले, विवेक गवळी, बाबुराव वाडकर, वैभव गळतगे, बाळू भोसले, शहाजी कोंगनुळे, अनिल शेट्टी, शीतल शेट्टी, सुभाष स्वामी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

