मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती देत राज्य सरकारला जोरदार झटका दिला आहे. भर पावसात तेथील बांधकामांवर हातोडा चालवण्याची काय गरज होती? या प्रकरणी सप्टेंबर महिन्यापर्यंत कोणतीही कारवाई करू नका, असे न्यायालयाने या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.
विशाळगडावरील अतिक्रमण काढताना रविवारी मोठा हिंसाचार झाला होता. या प्रकरणी काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. या याचिकेद्वारे विशाळगडावरील मशिदीवर चढाई करण्यात आल्याची बाब ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. या याचिकांवर शुक्रवारी झालेल्या तातडीच्या सुनावणीत न्यायमूर्ती बी पी कुलाबावाला व न्यायमूर्ती फिरदोस पुन्नीवाला यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती दिली.

