कोल्हापूर न्यूज नेटवर्क
फेरफार प्रलंबित राहण्याच्या कारणावरून तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकूने भोसकून खून झाल्याची घटना बुधवारी ता. 28 दुपारी 12.30 वाजता घडली . संतोष पवार असे तलाठ्याचे नाव आहे . वसमत तालुक्यातील आडगाव तलाठी कार्यालयात ही घटना घडली .
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त बुधवारी सकाळी तलाठी संतोष पवार हे नेहमी प्रमाणे, तलाठी सज्जा कार्यालयात येऊन कामकाज करीत बसले होते. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक तरुण दुचाकीवर कार्यालयात आला. यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करण्यास सुरवात केली. अचानक त्या तरुणाने काही कळण्याच्या आतच त्यांच्यावर चाकू हल्ला केला. यावेळी पोटात चाकूचे वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले. अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले. त्यानंतर तरुण दुचाकीवरून पसार झाला.
घटनास्थळी एकच आरडाओरडा सुरू झाला. तो ऐकून गावकऱ्यांनी तलाठी सज्जाच्या दिशेने धाव घेतली. गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.

