मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाहीत , त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नसल्याचे सांगत मनोज जरांगे पाटील यांचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय ; निवडणुकीतून घेतली माघार

Kolhapur news
By -

        



      अंतरवाली सराटी : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुस्लिम आणि दलित समाजासोबत विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची घोषणा केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज  माघार घेण्याच्या दिवशी सकाळपर्यंत उमेदवार देण्याबाबत मित्र पक्षांची यादी आली नसल्याने आपण कोणत्याच मतदारसंघात उमेदवार देणार नसल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मराठा समाजाचे उमेदवार एका जातीवर निवडून येऊ शकत नाही त्यामुळे एका जातीवर लढणे शक्य नसल्याचे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला.


याला पाडा, त्याला पाडा, अशी भूमिका देखील घेणार नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. मात्र, मराठा समाजाचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. निवडणूक झाल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी सरकारला दिला. मतदारसंघ निश्चित झाले होते. उमेदवारांची नावे देखील निश्चित झाली होती. माझ्याकडे रात्री साडेतीन वाजता उमेदवारांची यादी होती. मात्र, मित्र पक्षांनी त्यांची यादी पाठवली नसल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे एका जातीवर कसे लढणार? यामुळेच निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


महाविकास आघाडी असो की, महायुती असो, दोन्ही कडचे नेते हे सारखेच आहेत. त्यामुळे कोणाला पाठिंबा देत नाही किंवा कोणालाही निवडून आणा, असे देखील म्हणत नाही. केवळ माझे आंदोलन सुरू राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मात्र माझ्या आंदोलनात मला कोणी डिचवले तर मी त्याला सोडणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. ही माझी माघार नसून हा गनिमी कावा असल्याचा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.मराठा समाजाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. आपण कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

                  --------------------------