कोल्हापूर न्यूज / वि .रा .भोसले
देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हंटले जाते. राजकारणात चाणक्य नितीचे वेगवेगळे अर्थ लावले जातात.
मगध देशाचा नंद राजा अहंकारी होता.त्याने व त्याच्या मुलांनी चाणक्याचा अवमान केला.तेव्हा त्याने भर दरबारात प्रतिज्ञा केली होती की धनानंदाचे राज्य उलथवून लावीन तेंव्हाच मी माझ्या शेंडीची गाठ बांधेन.
दरबारातून बाहेर पडलेल्या चाणक्याला जंगलात 'राजा प्रजा 'असा खेळ खेळणारी मुलं दिसली.त्या खेळात राजा झालेल्या मुलालाच चाणक्याने पुढे पाटलीपुत्रचा सम्राट बनवले.
पराक्रमी चंद्रगुप्ताने नंद राज्य तर संपवलेच पण पुढे जगजेत्या अलेक्झांडर उर्फ सिकंदराला सुध्दा सीमेवरून परत पाठवले.
या ठिकाणी चाणक्य, चंद्रगुप्ताचा संदर्भ एका वेगळ्या अर्थाने घेतला आहे .
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात चक्क ३३ कॅबिनेट व ६ राज्य मंत्री आहेत.त्यात निम्म्याहून अधिक नवे चेहरे आहेत.
हे नवे चेहरे म्हणजेच चाणक्याने शोधलेले जणु चंद्रगुप्त आहेत असे म्हंटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
याचे कारणही तसे तगडे आहे.
या नव्या मंत्र्यांमध्ये प्रकाश आबिटकर,नितेश राणे,यासारखे जिगरबाज आमदार आहेत. प्रकाश आबिटकर यांनी तरूणपणीच आमदारकीची हॅटट्रिक केली आहे.त्यांचे समर्थक त्यांना कार्यसम्राट म्हणतात आमदारकीत त्यांनी एवढी कामे केली आहेत.आता तर ते एकदम कॅबिनेट मंत्री झाले आहेत .
नितेश राणे हे नारायण राणेंचे चिरंजीव असून हिंदुत्व वादी विचारांची लाट निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
असे आणखी कांहीं उच्च शिक्षित आणि कर्तबगार नवे मंत्री त्यांनी मंत्रीमंडळात घेतले आहेत.
विस्तारा नंतरच्या पहिल्याच मुलाखतीत त्यांनी इशाराही दिला आहे.
'सर्व मंत्रांच्या कामाचे ऑडिट केले जाईल.'
हे एवढेच नाही तर छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील,दीपक केसरकर,सुधीर मुनगंटीवार,विजय गावित या सारख्या जुन्या मंत्र्यांना वगळण्याचा साहसी निर्णय त्यांनी घेतलाय . एकनाथ शिंदे आणि अजित पवार या आपल्या शिलेदारांना सुध्दा त्यांनी विश्वासात घेतले आहे.
ही एक अग्नी परीक्षाच म्हणावी लागेल
'महाराष्ट्र आता थांबणार नाही '
हे घोषवाक्य त्यांचेच आहे.
विरोधकांना ई व्ही एम ची बाधा झाली आहे त्यामुळे देवेंद्र सरकारचा चहा सुध्दा पचेना झाला आहे. या चाणक्याने ओळखीचे एक स्मित करूनच त्यांना उत्तर दिलंय.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सुध्दा चाणक्य म्हंटले जाते ,पण ते एका दुसऱ्या अर्थाने. उमेदीच्या आमदारांना संधी देण्याचा प्रयोग त्यांनी कधि केला नाही.उलट पुलोद सारखी सरकारे निर्माण करण्याचे कौशल्य मात्र त्यांनी जरूर दाखवले.देवेंद्र फडणवीस सारख्या निस्पृह, संयमी आणि कर्तबगार नेत्याला आवरण्यासाठी जातीय फासा टाकण्याचा सुध्दा प्रयत्न त्यांनी केला होता. तो प्रयत्न फसला.
देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा जो अनोखा विस्तार केला आहे त्याला एकच संबोधन लागू पडते.
चाणक्याचे नवे चंद्रगुप्त प्रजेच्या कसोटीला उतरतील का ?
हे येणारा काळ ठरवेल.
-----------------------------------------

