मुंबई : अजित पवार यांना जवळ करत एकनाथ शिंदे यांना दूर लोटण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. दमानियांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ते नाराज दिसत आहेत, असा दावाही त्यांनी केला. तसेच आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करुन त्यांचा राजीनामा होईल, अशी अपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया वारंवार नवनवीन खुलासे करत आल्या आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड सहभाग असल्याचा आरोपी होत असल्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. अंजली दमानिया यांनीही धनंजय मुंडेंविरोधात अनेक पुरावे समोर आणले असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहेत. अंजली दमानिया यांनी एका मराठी वृत्त वाहिनीशी बोलताना धनंजय मुंडेंचा राजीनामा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणासह विविध विषयांवर भाष्य केले आहे.
राज्यातील राजकारणात येत्या दोन महिन्यांत मोठे बदल होणार आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात आहे. भाजपने एकनाथ शिंदेंचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी ते नाराज दिसत असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरु केलेल्या योजना आता बंद केल्या जात आहेत. अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असेही त्या म्हणाल्या.
-------------------------------

