कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुरगूड शहराला कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. पाण्याला दुर्गंधी सुध्दा येते.नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने या असुविधेबद्दल मुख्याधिकाऱ्यांनाच धारेवर धरुन प्रश्नांची सरबत्ती केली .मुरगूड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सरपिराजीराव तलावात ६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे . याशिवाय पाण्याची पर्यायी व्यवस्था वेदगंगा नदीतूनही होऊ शकते. बारमाही पाण्याचा मुबलक साठा असताना नगरपालिकेची पाणी वितरण व्यवस्था योग्य पद्धतीने काम करत नसल्याने शहराला अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.ऐन उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे याबद्दल नागरिकांत संतापाची लाट आहे.
नागरिकांच्या शिष्टमंडळाने पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी आतिश वाळुंज यांना मागणीचे निवेदन दिले. पाण्यासंबंधी सर्व प्रभागातून तक्रारी येत असताना त्याचे निवारण केले जात नाही . नवीन पाणी योजना कोठे अडली? मीटरद्वारे शहराला २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन हवेत विरले का? मीटर खरेदीवर लाखो रुपयाचा खर्च कशासाठी आणि कोणासाठी केला ?तलाव व नदीत पाणी मुबलक असताना शहरात पाणी टंचाई का? अशा प्रश्नाची सरबत्ती यावेळी करण्यात आली. मुख्याधिकाऱ्याकडून आपण पाहणी करून योग्य ती व्यवस्था करू असे आश्वासन देण्यात आले .
या शिष्टमंडळात नामदेव चौगले ,संजय मगदूम ,शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट , ओंकार पोतदार , तानाजी भराडे संकेत शहा,युवराज मोरबाळे , आदी प्रमुखासह अन्य नागरिक शिष्टमंडळात सहभागी झाले होते .
-----------------------------------------------