नागपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानावर 5 दिवस उपोषण केले. त्यांच्या या उपोषणाला यश आले व महायुती सरकारने आरक्षणाबाबतचा शासन निर्णय घेतला. त्यानुसार हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचे सरकारने मान्य केले. आता यावर नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट स्वतंत्र आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देता मराठा म्हणून सरसकट आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मागणीचे पत्र देखील देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी नुकतेच आंदोलन केले. यामध्ये मराठ्यांना काय मिळाले? असा सवाल मुधोजी भोसले यांनी पत्रातून केला आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. पण, त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्या, या मागणीतून मराठ्यांना काय सध्या झाले? असा प्रश्न भोसले यांनी उपस्थित केला आहे.
मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यात अर्थातच काही त्रुटी आहेत. परंतु, ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांना नक्कीच लाभ मिळावा. कागदपत्रांची पूर्तता करण्यात या लभाचा टक्का निश्चितच घसरणार आहे यात शंका नाही. अशात उर्वरित अंदाजे 2.50 कोटी मराठ्यांचे काय आहे? असा प्रश्न राजे मुधोजी यांनी विचारला आहे.
मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझे व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावे, जेणेकरुन हा पेच निर्माण होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनच मराठा आरक्षणाचा फायदा होईल. मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण द्यावे, जेणेकरुन 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे अधिक उर्वरीत 2.50 कोटी मराठ्यांना मराठा आरक्षणाचा फायदा होईल, असे राजे मुधोजी भोसले यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
--------------------------

