मुंबई : मराठा आरक्षणाचा जीआर पाहून माजी न्यायाधीस बी.जी. कोळसे-पाटील यांनी 'हे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर बसणारं नाही. त्यामुळे हा जीआर बघून मी हतबल झालो ', असे म्हटले आहे.
कोळसे पाटील म्हणाले, 'येवढ्या मोठ्या आंदोलनातून आपल्याला मिळाले काय? जरांगे पाटलांना फोन करून मी रडून सांगितलं होतं तुम्ही हे बरोबर करत नाही. यातून मराठ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. मराठ्यांचे नुकसान होणार आहे. तुझ्या तब्येतीचे नुकसान होणार आहे.'
'या जीआरचा सगळा मजकूर बघितला तर तुम्हाला तलाठ्यापासून ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सहायक अधिकारी यांच्याकडे जावे लागणार आहे. ज्याचं तोंड बघायला नको. त्यांच्याकडे जावं लागणार आणि शेवटी यातून कोर्ट देखील आहे. हे जे तुम्हाला कबूल केलं आहे. ते कुठल्याही कायद्याच्या कसोटीवर बसणारं नाही. कायदेशीर आरक्षण द्यायचे असेल तर ते केंद्र आणि राज्य सरकारला मिळूनच द्यावे लागेल ', असे देखील त्यांनी सांगितले.
मी 1976 पासून मरण, पोलिस आणि तुरुंग यांना न घाबरतां 100 टक्के खरं बोलून टिकेचा धनी व्हायला तयार आहे. डोंगर पोखरून उंदीर बाहेर काढणं म्हणजे काय हे मला आता समजलं. दिलेली सर्व वचनं त्यांनी कायदेशीर ठरवूनच दाखवावीत, असे आव्हान देखील कोळसे पाटील यांनी दिले आहे.
----------------------

