नवीन सरकारमध्ये शक्तिशाली तपास यंत्रणा ईडीवर नियंत्रण कोणाचे ?

Kolhapur news
By -

 

              


              कोल्हापूर न्यूज नेटवर्क

     

  काही दिवसातच नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेत असले तरी त्यांचे सरकार मित्रपक्षांच्या आधारावर टिकून आहे. यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्या प्रकारे फूट पडली ते पाहता आता जेडीयू आणि टीडीपी या दोघांनाही सभापतीपद राखायचे आहे. पक्षांतर झाल्यास सभापतीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते असे राजकीय तज्ज्ञ रशीद किडवई यांचे  म्हणणे आहे .तर सरकार स्थापनेपूर्वी  राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे . 


  लोकसभेचे माजी महासचिव पीडीटी आचारी यांच्या मते, अध्यक्ष हे लोकसभेचे प्रमुख आणि पीठासीन अधिकारी असतात. त्यांचे मुख्य काम नियम आणि नियमांनुसार सभागृह चालवणे आहे. ते संसदेच्या सदस्यांच्या अधिकारांचे आणि विशेषाधिकारांचे देखील संरक्षण करतात. संसदेशी संबंधित कोणत्याही बाबतीत त्यांचा निर्णय सर्वोच्च असतो.खासदारांना त्यांच्या बेशिस्त वर्तनासाठी सभापतीही शिक्षा करतात. पक्षांतराच्या आधारावर कोणत्याही खासदाराला अपात्र ठरवण्याचा अधिकारही सभापतींना आहे. म्हणूनच चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांची सभापती पदाची मागणी असल्याचे समजते . महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील फुटीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घटनानंतर तर या पदाला खूपच महत्त्व आले आहे

   सभापतीपदा बरोबरच वित्त मंत्रालयांचीही त्यांची मागणी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे . 

           E D वर नियंत्रण कोणाचे  ? 

अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ED वित्त मंत्रालयाच्या महसूल विभागात काम करते. चंद्राबाबू नायडू यांच्याविरुद्ध कौशल्य विकास महामंडळ प्रकरणाची फाइल ईडीकडे आहे. निवडणुकीपूर्वी ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांवर वेगाने कारवाई केली आहे. अशा स्थितीत देशातील सर्वात शक्तिशाली तपास यंत्रणा ईडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नायडू आणि नितीशही या विभागाची मागणी करत असल्याचे  सांगितले जाते . अर्थात हे सर्व चित्र मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.