एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या लेकी बाळींचे काय ? : महिला केंद्रीय मंत्र्याच्या मुलीचा पाठलाग करून टवाळखोरांनी काढला व्हिडिओ

Kolhapur news
By -

 

         

                     (मंञी रक्षा खडसे ) 
  
 जळगाव:केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींची टवाळखोरांनी छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार समोर यताच रक्षा खडसे यांच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून मुक्ताईनगर पोलिसात चार तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे एका मंत्र्याची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्व सामान्य जनतेच्या लेकी बाळींचे काय ? असा संतप्त सवाल मंत्री रक्षा खडसेंनी उपस्थित केला आहे. 

 

   महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषिका ही यात्रेत गेली होती, यादरम्यान काही टवाळखोर मुलांनी तिचा पाठलाग केला आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढले. याबाबत शंका येताच सुरक्षारक्षकाने त्याच्या हातातील मोबाईल घेतला. परंतु सुरक्षा रक्षकाबरोबर त्यांनी अरेरावी केली. याआधी देखील याच मुलांनी रक्षा खडसे यांच्या मुलीचा पाठलाग केल्याचं लक्षात आलंय. म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आज गुन्हा नोंदवण्यासाठी मुक्ताईनगर येथील पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या . दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी टवाळखोरांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवाय याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ही माहिती दिल्याची माहिती मंत्री रक्षा खडसेंनी दिली आहे.


       या कारणास्तव मुलीच्या सुरक्षिततेसाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज मुक्ताईनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या आहेत. या तरुणांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी पोलीस ठाणे गाठले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या की, आज एका मंत्र्याची, खासदाराची मुलगी सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य मुलींचे काय? याबाबत मी मुख्यमंत्र्यांची ही चर्चा केली आहे. असे त्यांनी सांगितले.


----------------------------------------------

राजकीय व्यक्ती असेल तर भर चौकात आणून फाशी द्या


रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली, व्हिडीओ बनवला, राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत. मुलगी कोणाची ही असो जर असे प्रकार झाले तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आमचे सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे, असे नवनीत राणा यांनी या प्रकारावर बोलताना म्हटले आहे. असे करणारे एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत, तर त्यांना भर चौकात आणून फाशी द्यावी, अशा शब्दांत राणा यांनी आपला संताप व्यक्त केला.

-------------------------------------------------------