आरं, खरंच की बाबा भाजपमध्ये जाणार....
ही चर्चा कागल तालुक्यातील तरण्या पोरांच्यात प्रत्येक कट्ट्यावर,पारावर,बस स्टँडवर, आणि चौका चौकात सुरू आहे.
संजय बाबा म्हणजे तालुक्यातील एक लाडकं हसरं व्यक्तिमत्व.राजकारण कमी पण समाजकारणात, आंदोलनात अधिक रस असणारा नेता.गोखले कॉलेज मधील पट्टीचा फुटबॉल पटू.गेली चाळीस वर्षे राजकारणात सुध्दा त्यांनी अनेक गोल केले.कांहीं चुकले. कधी जय,कधी पराजय.किक मारायला मात्र अजून विसरले नाहीत.कांहीं का असेना ,बाबा कसेही असले तरी तरुणांचे लाडके नेते आहेत.उबाठा मध्ये ते होते. बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष म्हणून ते त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले.पण सगळा भ्रमनिरास झाला.ज्याला व्हिजन म्हणतात त्यातले कांहीच या पक्षाकडे राहिले नाही.कुठले तरी कारण शोधायचे व त्यावर मोर्चे ,आंदोलन करत रहायचे एवढंच काम या पक्षाकडे राहिले होते.उद्धव ठाकरे यांची शिवराळ भाषणे व आदित्य ठाकरे यांचे बिन बुडाचे आरोप एवढंच भांडवल या पक्षाकडे राहिले असे वाटते.अडीच वर्षाच्या कालावधीत दीड वर्ष कोरोनात गेले.राजकारणात केवळ वडिलोपार्जित करिष्मा असून चालत नाही.कांहीं व्हिजन सुद्धा लागते.
राज ठाकरे यांचा मनसे पक्ष सुध्दा असाच.टोल नाके,मशिदींवरील भोंगे,मराठी पाट्या ,मराठी भाषा ,नोकऱ्या यापलीकडे तोही पक्ष सरकला नाही.राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार करणार असे म्हटले होते. ती प्रिंट अजूनही निघाली नाही.त्यांच्या सभेला तरुण पोरांची लाखोंने गर्दी असायची.रस्ते ब्लॉक व्हायचे .सत्ता नावाची बाला दूर कुठेतरी वरमाला घेऊन उभी असायची.पण नुसतीची मिमिक्री ऐकून ती नाराज होऊन मागच्या मागे अंधारात निघून गेली.भाजपा खरंच एक दमदार पक्ष आहे हे बाबांच्या सारख्या लाडक्या नेत्यांना पटू लागले आहे.
का नाही पटणार.?
विश्व वर्गात अगदी मागच्या बाकावर बसत असलेला व समोरच्याच्या पाठीवर उगीचच रेघोट्या ओढत असलेला भारत देश त्याच वर्गाचा मॉनिटर झालाय. पुतिन, ट्रम्प, झेलेंक्षी यासारखे गुरगुरणारे वाघ सुध्दा मोदी निवास नावाच्या आश्रमात शांत पडून राहतात . तोंडाला रक्त लागले असले तरी मोदींनी भरवलेली पुरणपोळी सुद्धा खायची त्यांची तयारी आहे.भाजपा मुळे भारत भारदस्त झालाय हे कोणीही नाकारणार नाही.
लांब कशाला जायचे ?
केजरीवालांकडील दिल्ली ची किल्ली हां हां म्हणता काढून घेतली.उत्तर प्रदेशात प्रत्येक समस्येला उत्तर द्यायला योगी समर्थ आहेत.तिकडे बघायचे कारणच नाही.अखिलेश नाही नाही म्हणत कुंभमेळ्यातला कलश घेऊन परतले आहेत.नुसत्या इफ्तार पार्ट्या करून राजकारण साधणार नाही हे त्यांना पटले आहे.
सबका विकास,सबका विश्वास ,सबकी साथ,हा नारा काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत पोचला आहे.जम्मू काश्मीर मधली मुस्लिम मुले एक सुरात राष्टगीत गाऊ लागली आहेत. दक्षिणेत अण्णा द्रमुकचे शिलेदार भाजपचे दरवाजे ठोठावत आहेत.
बंगालच्या रागीट बाईंची ममता आटत चालली आहे.मुल्ला मौलवी अस्वस्थ झाले आहेत.वक्फ बोर्डाचे झेंडे तेवढे त्यांच्या हाती दिसतात.
किती दिवस ?
वक्फ कायद्याने गरीब,दुर्लक्षित मुस्लिम बांधव न्याय कक्षेत आले आहेत.वाक्फच्या जमिनी ओवेसी सारख्या श्रीमंत राजकारण्यांनीच लाटल्या होत्या. तेथे भगिनींना सुद्धा बंधन होते.सगळं कांहीं पर्सनल लॉ प्रमाणे.
संजय बाबांनी चांगला गोल मारला आहे हे सांगायला नको.एके काळी तालुक्यात भाजपा औषधाला नव्हता.एका चहा पावडर विकणाऱ्या तरुणाने तो थोडा टिकवून ठेवला.चंद्रकांत दादा पदवीधर मतदार संघातून निवडून आले तेंव्हा त्यांना याच पोरांनी तालुक्यातून पदवीधरांची ताकद मिळवून दिली होती.पण पदवीधरांना येथे विचारतो को? बिचाऱ्यांनी शेवटी ऊसाच्या फडातील ठिबक सिंचन सारख्या सुधारित शेतीत लक्ष घातले.
राजकारण गेलं .....
बाबांच्यामुळे तालुक्यात विझलेल्या चुलीत सुद्धा जाळ तयार होऊ शकेल.होणंही गरजेचे आहे.तरणी पोरं कमळाचे झेंडे घेऊन कोपऱ्या कोपऱ्यावर उभी राहतील.
भारत माता की जय.
वंदे मातरम्.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शाहू महाराज यांच्या घोषणांनी तालुका दुमदुमून जाईल.
नाम.मुश्रीफ,नाम.आबिटकर यांची साथ सुद्धा निश्चित मिळेल.
बाबा तुम आगे बढो
हम तुम्हारे साथ है असे नारे ऐकू येऊ लागतील.
कारण .....?
कारण एक विशाल ग्राउंड बाबांना मिळेल.
-------------------------------------