मुंबई : भारताचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी रक्ताचा सडा पाडला आणि अनेक पर्यंटकांना जीवे मारलं. या हल्ल्यात आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी आहेत. या पर्यंटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. त्यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. धर्म विचारून जर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊ शकत नाहीत असं अबू आझमी म्हणालेत.
तर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना भर चौकात घेऊन फाशी द्यावी असे कादर मलबार यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.
न्यूज एजन्सी आयएएनएसशी संवाद साधताना अबू आझमी म्हणाले की, धर्माच्या नावावर अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक इस्लामला मानणारे असू शकत नाहीत.अशाच प्रकारची कृत्य करत राहिले तर त्यांना इस्लाममधून काढलं जाईल.
सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी
अबू आझमी म्हणाले की, सरकारने जर जम्मू काश्मीरमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असेल तर मग हा हल्ला कसा झाला ? याची जबाबदारीही सरकारने घ्यायला हवी. आता अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे, त्याचवेळी हा हल्ला झाला. तिथे जाणाऱ्या लोकांची जबाबदारी ही सरकारची आहे.
पहलगाम हल्ल्याचं सडेतोड उत्तर पाकिस्ताना दिलं जाणार हे आता जवळपास स्पष्टच झालं आहे. त्याबाबत सकाळपासूनच राजधानी नवी दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील या बैठकीला उपस्थित होते. जवळपास साडे तीन तास ही बैठक सुरू होती. बैठकीत सैन्यदलांच्या तिन्ही प्रमुखांनी पाकविरोधी कारवायांचे पर्याय राजनाथ सिंहांसमोर ठेवले. आता हे तीनही पर्याय संध्याकाळी होणाऱ्या सीसीएसच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात येणार आहेत.
दहशतवादी पाकिस्तानमध्ये गेल्याची चर्चा
पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांचा नरसंहार करणाऱ्या दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी हल्ला केल्यावर रात्रीच हे दहशतवादी पुन्हा पाकिस्तानात गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे आठ तास लागले असावेत, अशी माहिती समोर येत आहे. परत जाण्यासाठी देखील जवळपास तेवढाच वेळ लागला असावा. त्या हिशेबानं रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असावा अशी शक्यता आहे.
पर्यटक परतले नाहीत तर आम्ही उद्ध्वस्त होऊ - काश्मिरी
दरम्यान,काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २७ पर्यटकांची हत्या केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये शेकडो दहशतवादी हल्ले झाले आहेत, परंतु पर्यटक कधीही लक्ष्य झाले नाहीत. याचे कारण असे की काश्मिरींची घरे काश्मीरला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांवर चालतात. आणि दहशतवाद्यांनाही हे माहित आहे.
पर्यटक आता काश्मीर सोडून जाताहेत. बुकिंग रद्द केले जात आहे. पर्यटन उद्योगाशी संबंधित लोक विचार करत आहेत की त्यांचा व्यवसाय, जो पुन्हा रुळावर येत होता, तो या धक्क्यातून कसा सावरेल. तथापि, अशा घटनेनंतर हे घडेल हे आम्हाला माहित होते असे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांच्या कृत्यांमुळे आमची मान शरमेने झुकली आहे.
डोंबिवली : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे.महाराष्ट्रात आता त्यांचे मृतदेह आणण्यात येत आहेत. यातील मृतक दिलीप देसले यांचे मृतदेह पनवेल येथे त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले होते. याचसोबत डोंबिवली येथील संजय लेले यांचे पार्थिव देखील महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. यावेळी मंत्री आशिष शेलार तसेच भाजपचे नेते रवींद्र चव्हाण उपस्थित होते.
मुंबईच्या विमानतळावर मृतदेह आणण्यात येत आहेत. डोंबिवली येथील संजय लेले आणि पनवेल येथील दिलीप देसले यांचे पार्थिव मुंबई विमानतळावर आणण्यात आले. महाराष्ट्र सरकारतर्फे त्यांच्या नातेवाईकांची विमानतळावर भेट घेऊन सांत्वन केले. तसेच दिलीप देसले आणि संजय लेले यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली, अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली आहे.