नावीद हसन मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली.परदेशातील दौरा अर्धवट सोडून ते परत आले. विमानातून उतरून पोरांच्या खांद्यावर बसले आणि गुलालात न्हाऊन निघाले.
शांत ,विनयशील तरल स्वभावाच्या या मितभाषी युवकाला गोकुळ संघाचे कप्तानपद मिळाले.
लखोट्यातून एकदम व्यासपीठावर आलेल्या या तरुण नेतृत्वावर जसा अभिनंदनांचा वर्षाव झाला तसे उलट सुलट प्रतिक्रियांचे कांहीं शिंतोडे सुद्धा उडाले.
नावीद मुश्रीफ नेमके कोणाचे ? महा आघाडीचे , महायुतीचे की शाहू आघाडीचे ?
सहकारातील त्यांचा अनुभव किती ?
वडिलांकडे केडीसी बँक आणि मुलग्याकडे गोकुळ संघ.आता राहिली कोल्हापूर म.न.पा.
कॅप्टन कूल ला यातील नेमका रोल कोणता असो, राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो आणि कोण कोणाचा .....
नावीद यांची निवड कशीही झाली असली तरी गोकुळला एक समाधानी मनमिळावू नम्र नेतृत्व मिळाले आहे.
त्याचे श्रेय विनय कोरे, सतेज पाटील विश्वास पाटील वगैरे मान्यवर नेत्यांना कोणी देत असतील तर देवोत . खरे श्रेय मात्र अरुण डोंगळे यांनाच दिले पाहिजे.त्यांच्या बंडामुळे टीव्ही चे स्क्रीन आणि पेपरांची पाने यांना अनेक दिवस बातम्यांचा खुराक मिळाला असला तरी त्यांच्या मनासारखे झाले आहे.त्यांनी आणि विश्वास पाटील यांनीच तर गोकुळचा तक्ता पलटवला होता.
बदल हा सत्तेचा मूलभूत गुणधर्म असतो.
त्या बदला मुळेच नावीद मुश्रीफ यांना मोठी संधी मिळाली आहे. गाय आणि म्हैस मिळून दहा लाख लिटर्स पर्यंत संकलन असलेल्या व पुणे मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राची दुग्ध व्यवसायातील बाजार पेठ काबीज केलेल्या गोकुळ ची जबाबदारी त्यांच्यावर पडली आहे.या संधीचे त्यांनी सोनं करावे.
"झाडावर पिकलेला आंबा "
असेही त्यांना कांहीं जण म्हणतात.ते चुकीचे नाही.त्यांचे वडील नाम.मुश्रीफ यांचे संघटन कौशल्य ,समाजकारण आणि राजकारण यावर वेगळा ग्रंथ होईल.
सामान्य घराचा उंबरठा ओलांडून ते रस्त्यावर आले.सायकल ,स्कूटर जे मिळेल त्यावर स्वार होऊन त्यांनी जनसंपर्क सुरू केला.सभागृह मिळाले नाही तरी खर्डेकर चौकात घोळक्यात उभे राहून त्यांनी लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. त्या समस्या आपल्या समजून सरकारी,सहकारी,कार्यालयांना चकरा मारल्या .बाबूंना धारेवर धरून लोकांची कामे करून दिली.स्व .सदाशिवराव मंडलिक, विक्रमसिंह घाटगे ,शामराव भिवाजी पाटील ,दौलतरावजी निकम यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन नेतृत्वात स्वतःचा वेगळा ठसा निर्माण केला.
"माझा जन्म माझ्या हातात नव्हता "
असे समर्पक उत्तर देत जातीयवाद्यांना त्यांनी गप्प बसवले.त्यातून सलग ३० वर्षे म्हणजे ६ वेळा त्यांनी तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. जिल्ह्याच्या राजकारणाचे दोर सुद्धा त्यांनी हाती ठेवले आहेत.
नावीद मुश्रीफ यांना त्यांचा वारसा मिळाला आहे.जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभव सुध्दा नाविदनी स्मित हास्य करून स्वीकारला आहे.सेनापती संताजी संताजी घोरपडे सहकारी साखर कारखान्याची धुरा ते समर्थपणे सांभाळत आहेत.देश पातळीवर या कारखान्याने विकासाचे उच्चांक नोंदवले आहेत.सहकारी संस्थांचे नेतृत्व एकाभिमुख असावे लागते.आशिया खंडांतला सर्वात मोठा साखर कारखाना म्हणून ओळखला जाणाऱ्या वसंतदादा साखर कारखान्याची अवस्था अंतर्गत संघर्षातून काय झाली आहे हे महाराष्ट्राने अनुभवले आहे.संताजी घोरपडे कारखाना नावीदनी नावारूपाला आणला आहे.
नावीद मुश्रीफ यांना केवळ त्यांच्या वडिलांचेच पाठबळ असेल असे नाही तर इतर स्पर्धक,विरोधक,आणि सहकारी यांचेही सहकार्य लाभणार आहे.सगळ्या कसोट्या जिंकू शकेल असा नवा शुभमन गिल जणू गोकुळ संघाला मिळाला आहे.
-------------------------------