निपाणी : निपाणीतील वादग्रस्त अशोकनगरमधील जागेप्रकरणी वकील बदलण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्याचा निर्णय ३१ मे पर्यंत घेण्याची मुदत दिली होती. पण, मुदतीत पालिकेकडून उत्तर न मिळाल्याने व निर्णय न झाल्याने सोमवारी २ रोजी सकाळी १०.३० वाजल्यापासून पालिकेसमोर शहरवासीयांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. अशोकनगर जागेप्रकरणी दावा पुन्हा दाखल करून घेऊन तो चालविण्याबद्दल ६ जूनला सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता आंदोलन सुरू झाल्यामुळे अशोकनगर जागा प्रकरण पुन्हा तापले आहे.
हे प्रकरण न्यायालयात असतांना त्या विरोधात झालेल्या घडामोडीं विरोधात शहरवासीयांत तीव्र नाराजी आहे. अशोकनगर जागा ही सार्वजनिक वापरासासठी राखीव असताना जागेचे प्रकरण न्यायालयात गेल्याने तो लढा सुरु आहे. यापूर्वी हे प्रकरण उच्च न्यायालयात सुरु असताना पालिका आयुक्त डी. एस. हरदी यांनी हे प्रकरण मागे घेतले. पालिका पदाधिकारी, नगरसेवकांनी सभागृहाला अंधारात ठेवून प्रकरण मागे घेतले असल्याचे सांगितले जात असले तरी त्यामागचे गौडबंगाल काय ? असा प्रश्न शहरवासीयांच्यामधून उपस्थित केला जात आहे.
यापूर्वीचे वकील व्ही. आर. निकम यांचे निधन झाल्यावर त्यांच्या जागी अन्य वकिलाची पालिकेने रितसर नेमणूक करणे आवश्यक होते. पण पालिकेने याप्रकरणी अन्य वकिलाची नेमणूक केली नाही. केवळ अशोकनगर जागेप्रकरणी मुर्तुले यांची पालिकेने नेमणूक केली, पण ते कधीही याप्रकरणी न्यायालयात हजर झालेले नाहीत. यामुळे या प्रकरणी मुर्तुले यांच्याऐवजी अन्य वकिलांची पालिकेने नेमणूक करण्याची मागणी आहे. या धरणे आंदोलनामध्ये विठ्ठल वाघमोडे, डॉ. अच्युत माने, व्ही. एस. जाधव, सुधाकर माने, कबीर वराळे , तुकाराम कोळी, अशोक खांडेकर, आरेश सनदी, अशोक चाळके, अस्लम शिकलगार, बाबासाहेब मगदूम यांच्यासह नानागरिकांनी सहभाग घेतला.
------------------------------