कोल्हापूर न्यूज नेटवर्क
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावी प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीचे कट ऑफ व कोटा अंतर्गत प्रवेश जाहीर करण्यात आले आहेत. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरलेल्या 2 लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांना विविध कनिष्ठ महाविद्यालयात त्यांनी दिलेल्या पसंती क्रमानुसार कॉलेज अलॉट करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांनी 18 ते 21 जुलै या कालावधीत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे अपेक्षित आहे, असे राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ.महेश पालकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. दुसऱ्या फेरी अंतर्गत विज्ञान शाखेसाठी 1 लाख 29 हजार 35 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट करण्यात आले आहे. वाणिज्य शाखेच्या 69,442 विद्यार्थ्यांना तर कला शाखेच्या 53 हजार 327 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे.
पहिल्या फेरीतून आतापर्यंत 5 लाख 7 हजार 288 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. दुसऱ्या फेरीतून केवळ 2 लाख 51 हजार 804 विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरी अखेर केवळ सात ते साडेसात लाख विद्यार्थीच प्रवेश घेऊ शकणार आहेत. राज्यात अकरावीसाठी कॉलेजमध्ये 21 लाख 32 हजार 960 एवढी प्रवेश क्षमता आहे. तर अकरावी प्रवेशासाठी 16 लाख 25 हजार 672 एवढ्या जागा सध्या रिक्त आहेत. त्यामुळे अजूनही लाखो विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत.
विभागनिहाय कॉलेज अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी
अमरावती 21,104
छत्रपती संभाजीनगर 29,358
कोल्हापूर 18,768
लातूर 13,640,
मुंबई 79,403
नागपूर 22,040
नाशिक 23,789,
पुणे 43,702
---------------------------