कोल्हापूर न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. ११ : आषाढी वारी ही केवळ पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाची यात्रा नसून, ती लाखो भाविकांच्या श्रद्धा, विश्वास आणि भावविश्वाला जोडणारी अखंड जीवनयात्रा आहे. या यात्रेत अनेक वारकरी दिवसन्-दिवस पायी चालत असतात. अशा वेळी त्यांच्या हातातील मोबाईल बंद पडला, तर केवळ एक उपकरण बंद होत नाही, तर त्यांच्या घरच्यांशी असलेला संवादही तुटतो. याच भावनेची जाणीव ठेवत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चातून ५ अत्याधुनिक मोबाईल चार्जिंग व्हॅन तयार करून त्या वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी समर्पित केल्या आहेत.
या मोबाईल चार्जिंग व्हॅन युवा शिवसैनिकांच्या माध्यमातून वारीसोबत सातत्याने प्रवास करत आहेत. गरजेनुसार प्रत्येक वारकऱ्याला पूर्णपणे मोफत आणि अल्पावधीत मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. एका वेळी १०० मोबाईल चार्ज करण्याची क्षमता असलेल्या या व्हॅनमुळे हजारो वारकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
वारीत चालताना अनेक वारकरी आपल्या कुटुंबीयांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात. घरच्यांना केवळ एक फोन करून "मी सुखरूप आहे" एवढे सांगणेही त्यांच्यासाठी अमूल्य असते. मोबाईल चार्ज असल्यामुळे वारकरी आपल्या कुटुंबीयांशी २४ तास संपर्कात राहू शकतात, त्यांच्या मनातील काळजी दूर होते आणि वारीचा आनंद अधिक निश्चिंतपणे अनुभवता येतो.
या उपक्रमाबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, "वारी ही सेवाभावाची परंपरा आहे. वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा. त्यांच्या हातातील मोबाईल चालू राहिला, तर त्यांच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य कायम राहील. ही सुविधा केवळ मोबाईल चार्ज करण्याची नाही, तर माणसामाणसांतील नाती, आपुलकी आणि विश्वास जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे."
विठ्ठलनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि सेवाभावाच्या या अनोख्या उपक्रमामुळे प्रताप सरनाईक यांनी वारकऱ्यांच्या यात्रेत आणखी एक भावनिक आणि माणुसकीचा अध्याय जोडला आहे. श्रद्धेच्या वाटेवर चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलवणारी ही सेवा वारीतील लोकसेवेचा आदर्श ठरत आहे.
---------------------------

